थकीत शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार; हे शेतकरी पात्र ; राज्यातील २०१७ च्या कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या थकीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा प्रश्न पुन्हा एकदा हिवाळी अधिवेशनात उपस्थित झाला आहे. या प्रश्नावर वारंवार शेतकरी संघटनांनी आवाज उठवला आहे आणि या संदर्भात कोर्टात याचिका देखील दाखल करण्यात आल्या होत्या. कोर्टाने निकाल दिला असला तरी, अद्याप या शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नव्हती. सध्या सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात प्रश्नोत्तराच्या दरम्यान, आमदार भास्कर जाधव यांच्या माध्यमातून या थकीत कर्जमाफीसंदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला. या चर्चेत रोहित पवार आणि इतर लोकप्रतिनिधींनी देखील सहभाग घेतला.
या चर्चेदरम्यान, सहकार मंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या उत्तरांनुसार, मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल लागूनही, २०१९ च्या कर्जमाफीपासून राज्यातील ६ लाख ५६ हजार शेतकरी अजूनही वंचित आहेत. या सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी शासनाला ५९७५ कोटी ५१ लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. या उत्तरामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.




















