राज्यात पुन्हा ढगाळ वातावरण..आवकाळी पाऊस? डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या हवामान अंदाजानुसार, सध्या देशातील हवामान प्रणाली सक्रिय असून, यामध्ये ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) आणि बंगालच्या उपसागरातील बाष्पाचा प्रभाव महत्त्वाचा आहे. उत्तर भारतामध्ये WD सक्रिय असल्याने, संपूर्ण पूर्व भारतातील राज्यांमध्ये तसेच राजस्थान, पंजाब, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशात धुई आणि धुक्याचा मोठा प्रभाव राहील. विशेषतः उत्तर प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात धुक्याचा अधिक गंभीर परिणाम जाणवण्याची शक्यता आहे. थंडीच्या लाटेबद्दल बोलायचं झाल्यास, पश्चिम मध्य प्रदेश, तेलंगणा आणि संपूर्ण कर्नाटकात कडाक्याची थंडी कायम आहे.
महाराष्ट्राचा विचार केल्यास, राज्य सध्या थंडीच्या लाटेच्या ‘काठावर’ असल्याने, अजूनही बऱ्यापैकी थंडी अस्तित्वात आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये तापमान ११ अंश सेल्सिअस ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान दिसून येत आहे, जे कडाक्याच्या थंडीचे संकेत देतात. येत्या काही दिवसांत थंडी एकदम संपणार नाही, तर तिची तीव्रता कमी-अधिक होत राहील असा अंदाज आहे.




















